प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे :जला दो जला दो पाकिस्तान जला दो…, एक धक्का और दो पाकिस्तान तोड दो…, पाकिस्तान मुर्दाबाद… अशा घोषणा देत काश्मीरमधील पहेलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध पुण्यातील गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत केला.जय गणेश व्यासपीठ पुणे शहरांतर्गत शहरातील ५० गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी बेलबाग चौकात एकत्र येत हे आंदोलन केले.
यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांसह दत्ता सागरे, शिरीष मोहिते, पियुष शहा, अजय पैठणकर, विकास पवार, नितीन पंडित, पृथ्वीराज परदेशी, अमोल केदारी, अक्षय गोडसे, भूषण पंड्या, प्रकाश चव्हाण, तुषार रायकर, स्वप्नील दळवी, राहुल जाधव, विक्रम गोगावले, कौस्तुभ खाकुर्डीकर, स्वप्नील मालेगावकर, निलेश पवार, निखिल धारप, अमित जाधव आदी उपस्थित होते.
दहशतवाद्यांनी धर्म विचारून पर्यटकांवर गोळ्या झाडल्या आहेत, उद्या आपल्या घरात घुसून मारेपर्यंत वाट पाहू नका. आपण एकत्र येण्याची आणि एकसंघ राहून उत्तर देण्याची हीच वेळ आहे. पुण्यातील सर्व गणेशोत्सव मंडळे या भ्याड आणि क्रूर दहशतवादी हल्ल्याचा निषेध करीत आहेत, असे रासने म्हणाले.
भारताचे नंदनवन असलेल्या काश्मीरमध्ये पर्यटकांची धर्माची ओळख विचारून हत्या केली. पुण्यातील, महाराष्ट्रातील निष्पाप लोकांचा बळी यामध्ये गेला. याचा निषेध करण्यासाठी पुण्यातील सर्व गणेशोत्सव मंडळे एकत्र आली आहेत. देशाचा आर्थिक कणा मोडण्यासाठी आणि भारतात धर्म युद्ध भडकविण्यासाठी हे कृत्य करण्यात आले आहे. भारतीयांचा सरकारवर विश्वास आहे, त्यामुळे भारत सरकारने हल्ला करणाऱ्या विरोधात कडक पावले उचलली पाहिजेत, असे सूर्यवंशी म्हणाले.