बडोदा जेएनपीटी महामार्गाच्या भूसंपादनात आदिवासींची फसवणूक ,७४ लाख ५० हजार रुपये परस्पर दुसऱ्या खात्यात वळवले,

 रा.जि.प चे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, नेरळ ग्रा. पं माजी सरपंच भगवान चंचे यांच्यासह चौघांना अटक, बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्याची कारवाई.



प्रेस मीडिया लाईव्ह  :

विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

बदलापुरातून जाणाऱ्या बडोदा जेएनपीटी महामार्गाच्या भूसंपादनात जागामालक असलेल्या आदिवासींची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बदलापूर ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल करत चार आरोपींना अटक केली असून, यामध्ये सध्या शिवसेना शिंदे गटात असलेले रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात असलेले नेरळ ग्रामपंचायतीचे  माजी सरपंच भगवान चंचे यांचाही समावेश असल्याने खळबळ माजली आहे. 



बदलापूरच्या ग्रामीण भागातून जाणाऱ्या बडोदा जेएनपीटी महामार्गासाठी काही वर्षांपूर्वी भूसंपादनाची प्रक्रिया पार पडली होती. या भूसंपादनात १० आदिवासी जागामालकांच्या बँक खात्यात आलेले ७४ लाख ५० हजार रुपये या आरोपींनी परस्पर स्वतःच्या आणि निकटवर्तीयांच्या खात्यात वळवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी बदलापूर ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल करत रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, नेरळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भगवान चंचे, संजय गिरी आणि समीर वेहळे या चौघांना अटक केली असून आणखी ५ ते ६ आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी एपीआय गोविंद पाटील यांनी दिली आहे. तर या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या चौघांना उल्हास नगर येथील चौपडा कोर्टात  हजर केलेचे व या चौघांना न्यायलयानी दि.७ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आल्याचे खात्री लायक सुत्रा कडून माहिती समोर येत आहे. तर  या प्रकरणात थेट सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटातील नुकताच पक्ष प्रवेश केलेले रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि नेरळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच यांना अटक झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. यामध्ये काही तत्कालीन सरकारी अधिकाऱ्यांचाही सहभाग होता का? हे देखील आता पोलीस तपासात समोर येणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post