खंडपीठासाठी १८ फेब्रुवारीला महारॅलीत साडेतीन हजार वकिलांचा समावेश.

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर  -- कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांसाठी खंडपीठ मागणीसाठी वकिलांनी पुन्हा आंदोलनाची मोट बांधली असून, हे आंदोलन टप्प्याटप्प्याने तीव्र करण्याचा निर्णय बैठकीत घेतला आहे. सरकारला जागे करण्यासाठी १८ फेब्रुवारी रोजी शहरातून लक्षवेधी महारॅलीचे आयोजन केले आहे. या रॅलीत साडेतीन हजार वकील, पक्षकार व विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी हजर राहणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले जाणार आहे, असा निर्णय गुरुवारी न्यायसंकुलात झालेल्या बैठकीत घेतल्याची माहिती बारचे अध्यक्ष ॲड. सर्जेराव खोत यांनी पत्रकारांना दिली.             

मंगळवार, दि. १८ रोजी सकाळी ११ वाजता सर्व वकील, लॉ कॉलेजचे विद्यार्थी, पक्ष, संघटनांचे पदाधिकारी जिल्हा न्यायालयाच्या दारात जमतील. त्यानंतर दुचाकींवरून खंडपीठाच्या घोषणा देत माहिती फलक घेऊन ही रॅली पोलीस अधीक्षक कार्यालय, पितळी गणपती, धैर्यप्रसाद हॉल, ताराराणी पुतळा, स्टेशन रोड, दसरा चौक, लक्ष्मीपुरी, बिंदू चौक, शिवाजी महाराज पुतळा, भाऊसिंगजी रोड, सीपीआर चौक, खानविलकर पंपापासून जिल्हाधिकारी कार्यालयात येईल. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवले जाणार आहे.

जिल्हा न्यायालयातील शाहू सभागृहात झालेल्या या बैठकील तालुका बारचे पदाधिकारी हजर होते. तालुका बारच्या पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूर खंडपीठ कृती समिती जो निर्णय घेईल तो मान्य करतो; मात्र केवळ बैठका घेऊन चालणार नाही, काही तरी ठोस आंदोलन केल्याशिवाय पदरात खंडपीठ पडणार नाही, असे मत मांडले.

   कोल्हापूरला आजपर्यंत मागून काहीच मिळालेले नाही. धारवाड खंडपीठ मिळवण्यासाठी तेथील वकिलांनी कठोर भूमिका घेतली होती, तशा प्रकारची भूमिका घेणे गरजेजे आहे, असे सांगितले. महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिलचे सदस्य ॲड. विवेक घाटगे यांनी लोकअदालतीच्या कामकाजापासून दूर राहणे म्हणजे ज्युनिअर वकिलांना मिळणारे मानधन चुकवण्याचा प्रकार आहे, त्यामुळे असे आंदोलन न करता मुख्यमंत्री व उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांची भेट तातडीने घडण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले. माजी अध्यक्ष प्रकाश मोरे यांनी आपापसातील वाद बाजूला ठेवून एकदिलाने लढा देऊया, असे सांगितले.

अध्यक्ष ॲड. सर्जेराव खोत यांनी समारोप करताना बैठकीत वकिलांनी मांडलेल्या भूमिकेचे समर्थन केले. काही वकिलांनी तीव्र शब्दांत मत मांडले. त्यामुळे आंदोलनास आलेली मरगळ दूर होत असल्याचे सांगितले.

या बैठकीला जयसिंगपूर बारचे अध्यक्ष ॲड. धनंजय पाटील, सिटी क्रिमिनल बारचे अध्यक्ष ॲड. दत्ताजी कवाळे, कागल बारचे अध्यक्ष ॲड. मिलिंद पाटील, कुरुंदवाड बारचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, कळे बारचे अध्यक्ष अभिजित पाटील, पन्हाळा बारचे अध्यक्ष रवींद्र तोरसे, शाहूवाडी बारच्या अध्यक्ष सावित्री सपाटे, इचलकरंजी अतिरिक्त जिल्हा बारचे सचिव सदाशिव आरेकर, माजी अध्यक्ष ॲड. रणजित गावडे, ॲड. गिरीश खडके, ॲड. शिवाजीराव राणे, ॲड. अजित मोहिते, ॲड. संपतराव पवार, ॲड. प्रमोद दाभाडे, ॲड. मीना पवार तसेच बार असोसिएशनचे वकील सभासद उपस्थित होते.

---------------

 

Post a Comment

Previous Post Next Post