प्रेस मीडिया लाईव्ह :
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
( ९८ ५०८ ३० २९० )
prasad.kulkarni65@gmail.com
कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर उर्फ काकासाहेब खाडीलकर यांचे मराठी साहित्य ,पत्रकारिता, राजकारण यामध्ये अतिशय मोठ्या स्वरूपाचे योगदान आहे.मराठी नाटक आणि रंगभूमीचा इतिहास तर त्यांच्या योगदानाने सुवर्णाक्षरी झाला आहे.१९१७ साली पुण्यात झालेल्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष होते.२३ नोव्हेंबर १९७२ ( काही ठिकाणी २५ नोव्हेंबर अशीही तारीख आहे )रोजी जन्मलेले खाडीलकर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वर्षभरातच म्हणजे २६ ऑगस्ट १९४८ रोजी कालवश झाले. त्यांचा जन्म व शालेय शिक्षण सांगलीत झाले. तत्वज्ञान विषय घेऊन बीए झाल्यावर त्यांनी सांगलीत दोन वर्षे शिक्षकाची नोकरी केली. पुढे ते कायद्याच्या अभ्यासासाठी मुंबईला गेले. तेथे लेखन करू लागले. केसरीत लिहू लागले.१९०१ मध्ये ‘गनिमी काव्याचे युद्ध’ ही लेखमाला लिहिली.
१९०२ ते ४ ही दोन वर्षे ते नेपाळ मध्ये होते. तेथे त्यांनी टिळकांच्या सांगण्यानुसार शस्त्रांचा कारखाना सुरू करण्याचा प्रयत्न केला अशी चर्चा होती.ही गोष्ट कानोकांनी होऊ लागली तसे ते मायदेशी परतले.१९०५ साली पुन्हा केसरीत काम करू लागले.टिळकांची भाषाशैली ज्यांनी आत्मसात केली.लोकमान्यांच्या स्वराज्यवादी जहाल भूमिकेशी ठाम राहून त्यांनी केसरीत लेखन केले. टिळकांच्या अध्यात्मनिष्ठ राष्ट्रवादाचा त्यांनी पुरस्कार केला.ते १९०७ मध्ये तिसऱ्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष होते. १९०८ पासून टिळकांच्या तुरुंगवासाच्या काळात ते केसरीचे संपादक होते. १९१० मध्ये केसरीचे संपादकत्व त्यांनी सोडले. १९१३ मध्ये बाल्कन युद्धावरील लेखमाला लिहिली. १९१४ मध्ये चित्रमयजगत् मध्ये पहिल्या महायुद्धावरील लेखमालेस प्रारंभ केला. १९१८ मध्ये लोकमान्य टिळक व न. चिं. केळकर हे परदेशी गेल्यामुळे केसरीचे ते पुन्हा संपादक झाले.
त्यांचे लेखन वैशिष्ट्य सांगताना मराठी वांग्मय कोषामध्ये म्हटले आहे की, तात्विक बैठकीचा बैठकीचा आभास उत्पन्न करून प्रचाराचा मुद्दा ठाशिवपणे मांडण्याचे प्रचारकी कौशल्य,भावनात्मक, विकारवशता आणि पंडित्य यांच्या संमिश्र रसायनाने लेखन परिणामकारक करण्यातील हातोटी ही त्यांचा निबंध लेखनाची वैशिष्ट्ये होती. प्रतिपक्षाची हाकनाक टवाळी, निंदा त्यांनी त्यांचे लेखन क्वचित डागाळलेले दिसते.भावनेची मानवी जीवनातील गरज जाणून त्यांनी भावनांचे पोषण होईल अशा प्रकारच्या निबंध लेखनाच्या एका संप्रदायाला पुष्ट आणि समृद्ध बनविले.
लोकमान्यांच्या निधनादरम्यानच म्हणजे १९२० साली खाडीलकर केसरीतून बाहेर पडले.'लोकमान्य ' या नियतकालिकाचे संपादक बनले. १९२३ मध्ये त्यांनी ' नवाकाळ ' हे वृत्तपत्र सुरू केले ते आजही सुरू आहे.१९२७ मध्ये हिंदुमुसलमानांच्या वादावरील लेखाबद्दल नवाकाळवर खटला होऊन खाडिलकरांना दंडाची शिक्षा झाली. १९२९ मध्ये राजद्रोहाचा खटला झाला व एक वर्षाची शिक्षा झाली. याच दरम्यान त्यांना अर्धांगवायूचा झटका आला.त्या नंतरचा बराचसा
काळ ते सांगलीतच वास्तव्यास होते. खाडिलकरांनी वृत्तपत्रीय लेखनाबरोबरचा अनेक पुस्तके लिहीली .कांचनगडची मोहना (१८९८), सवाई माधवराव यांचा मृत्यु (१९०६), कीचकवध (१९०७), संगीत बायकांचे बंड (१९०७), भाऊबंदकी (१९०९), प्रेमध्वज (१९११), संगीत मानापमान (१९११), संगीत विद्याहरण (१९१३), सत्त्वपरीक्षा (१९१५), संगीत स्वयंवर (१९१६), संगीत द्रौपदी (१९२०), संगीत त्रिदंडी संन्यास (१९२३), संगीत मेनका (१९२६), सवती-मत्सर (१९२७) आणि संगीत सावित्री (१९३३) आदी नाटके लिहीली.
त्यांची गद्य नाटके शाहूनगरवासी आणि महाराष्ट्र नाटक मंडळींनी तर संगीत नाटके किर्लोस्कर आणि गंधर्व नाटक मंडळींनी रंगभूमीवर आणली होती.१९२१ साली.महात्मा गांधींच्या टिळक स्वराज फंडासाठी बालगंधर्वाची गंधर्व नाटक कंपनी आणि केशवराव भोसले यांची ललितकलादर्श कंपनी यांनी एकत्र येऊन संयुक्तपणे संगीत मानापमान नाटकाचे प्रयोग केला. परस्परांच्या स्पर्धक असलेल्या या कंपन्या टिळक प्रेमापोटी एकत्र आल्या होत्या. त्याबाबतच्या अनेक कथा- दंतकथा गेले शतकभर रसिकांमध्ये पसरलेल्या आहेत. त्या इतिहासावर नुकतेच म्हणजे ऑक्टोबर २०२४ मध्ये' गोष्ट संयुक्त मानापमानाची ' हे नाटक नामांतर नाटककार अभिजन अभिराज भडकमकर यांनी लिहिले आहे आणि ते ऋषिकेश जोशी यांनी दिग्दर्शित केले आहे.
आपल्या नाटकातून त्यांनी तत्त्वज्ञान, राजनिष्ठा, वैश्विकता, विचार प्रवणता आदी बाबी रुजवण्याचा प्रयत्न केला.कीचकवध या त्यांच्या नायकाबाबत १८ जानेवारी १९१० च्या लंडन टाइम्स मध्ये लेख आला होता. त्यात म्हटले होते की, हे नाटक पौराणिक असले तरी रूपकात्मक आहे. ते वर्तमान राजकीय परिस्थितीचे दिग्दर्शन करते.या नाटकातील कीचक म्हणजे लॉर्ड कर्झन,द्रौपदी म्हणजे भारतमाता युधिष्ठिर आणि भीम म्हणजे मवाळ व जहाल पक्ष. हे स्पष्ट करून या लेखात पुढे म्हटले होते की, हे नाटक रंगभूमीवर आल्यापासून ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या खुनाचे प्रयत्न झाले.ज्या नाट्यगृहात या नाटकाचा प्रयोग झाला त्यातच कलेक्टर मारला गेला.परिणामी २७ जानेवारी १९१० रोजी कीचकवध नाटकावर बंदी घालण्यात आली. पुढे सहा वर्षे कायम होती.
नाटककार हीच खरी ओळख असलेल्या खाडीलकरांनी उत्तरायुष्यात त्यांनी रुद्र, संध्यावंदन व पुरुषसूक्त, ऐतरेय आणि ईशावास्योपनिषद, तैत्तिरीयोपनिषद, ॐकाराची उपासना, याज्ञवल्क्यमैत्रेयीसंवाद व त्रिसूपर्णाची शिकवणूक असे विविध स्वरूपाचे अध्यात्मपर लेखनही केले.त्यांच्या महत्त्वाच्या लेखांचा व भाषणांचा संग्रह खाडिलकरांचा लेखसंग्रह (भाग १ व २, १९४९) या नावाने प्रसिद्ध असून पहिल्या महायुद्धावरील त्यांच्या लेखमालेचे पाच भाग आहेत.
खाडीलकरांबद्दल मराठी विश्वकोशात म्हटले आहे" मराठी रंगभूमीच्या आणि मराठी नाट्यवाङ्मयाच्या इतिहासात खाडिलकर या नावाला अनन्यसाधारण स्थान आहे. खाडिलकरांच्या लेखणीमुळे मराठी गद्य आणि संगीत रंगभूमीला खरा वैभवाचा काळ लाभला. खाडिलकरांची नाट्यप्रतिभा सदैव इतिहासकाळात आणि पुराणकाळात रमली. त्या काळातील व्यक्ती आणि घटना यांत दडलेल्या प्रभावी नाट्याने तिला सतत आकर्षून घेतले. त्याचा तिने वर्तमानाच्या संदर्भात अर्थ लावला. भूताचा अर्थ वर्तमानाच्या संदर्भात लावणे, भूताचे वर्तमानाशी असणारे नाते व्यक्त करणे हा सदर प्रतिभेचा सहजधर्मच होता. तिला सतत भूतात वर्तमान दिसले व त्या दृष्टीने परिणामकारक नाट्यदर्शन घडविण्याचा तिने प्रयत्न केला. श्रीकृष्ण, कीचक, राम, कच, शुक्राचार्य, रामशास्त्री, राघोबादादा, आनंदीबाई, द्रौपदी, कंकभट ही एकापेक्षा एक अशी अविस्मरणीय पात्रे तिने मराठी रंगभूमीवर उभी केली. त्यांच्या जीवनाचे नाट्य जेवढा भूतकालीन घटनांवर प्रकाश टाकते, तेवढाच वर्तमानकालीन घटनांचा अर्थ लावते, असा प्रत्यय मराठी प्रेक्षकांना सतत आला.....खाडिलकरांच्या नाटकांतील संवाद ज्याप्रमाणे अगदी सहजपणे पात्रांच्या परस्परभावसंबंधांचे नाट्य व्यक्त करतात, त्याचप्रमाणे त्यांच्या विविध भूमिकांमधून सूचित होणारे प्रभावी विचार-नाट्य व्यक्त करतात. खाडिलकरांचे असाधरण नाट्ययश त्यांच्या नाट्यप्रतिभेच्या ह्या विशेषांमध्ये आहे."
(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार, वक्ता म्हणून सुपरिचित आहेत.)