शिक्षक दिनाचे औचित्य साधून उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शिक्षकांचा सौ.अरुधंती महाडिक यांच्या हस्ते सत्कार.


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

 कोल्हापूर  - रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून उल्लेखनीय कामगिरी केलेल्या  शिक्षकांचा सौ. अरुंधती महाडिक यांच्या हस्ते सत्कार  करण्यात आला.समाजाचे आपण देणे लागतो, या भावनेतून शिक्षक वर्गाकडून देशाची भावी पिढी घडवली जाते. अशा शिक्षक वर्गाबद्दल आदर व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे. आपल्या मुलांना संस्कारक्षम बनवण्यात शिक्षकांचा मोठा वाटा असल्याने शिक्षकांचा सत्कार आपल्या हातून होणे हा भाग्याचा आणि आनंदाचा क्षण आहे, असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांनी केले. आंतरराष्ट्रीय शिक्षक दिनाचे औचित्य साधून दहा उपक्रमशिल शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी सौ. महाडिक बोलत होत्या.  

  दरवर्षी ५ ऑक्टोंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून संपन्न होतो. या दिनाचे औचित्य साधून शनिवारी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या वतीने कोल्हापूर शहरातील १० मान्यवर शिक्षकांचा सत्कार अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांच्या हस्ते आणि प्रायव्हेट हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक. प्रवचनकार दीपक भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. नेशन बिल्डिंग ऍवॉर्ड असे या कार्यक्रमाचे स्वरूप होते.

 देशाची भावी पिढी घडवण्यात शिक्षकांचे मोठे योगदान असल्यामुळे त्यांच्या प्रति आदर व्यक्त करण्यासाठी संस्थेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये सौ. गीता कोरवी, संगीता जगदाळे, कल्पना जगदाळे, कुसुम पांढरबळे, वर्षा येझरे, सीमा खोत, रेश्मा आरवाडे, महेश उपाध्ये, इंद्रजीत भोसले, मनोहर पवार या शिक्षकांना सौ. अरूंधती महाडिक यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, मानपत्र घेऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलताना सौ. महाडिक यांनी शिक्षक वर्गाबद्दल गौरवोद्गार काढले. आपल्या मुलांना सुसंस्कृत बनवण्यात शिक्षकांचा मोठा वाटा असतो. त्यांच्या कार्याची जाणीव आपण सर्वांनी ठेवली पाहिजे. शाळकरी मुलांना मोबाईलपासून दूर ठेवणे हे प्रत्येक पालकाचे कर्तव्य आणि जबाबदारी आहे, असें सांगत सौ. महाडिक यांनी आपल्या हातून गुरुजनांचा सत्कार होतोय. हा आपल्यासाठी भाग्याचा आणि आनंदाचा क्षण असल्याचे नमूद केले. यावेळी प्रवचनकार दीपक भागवत यांनी आपल्या रसाळ वाणीतून आजच्या शिक्षण व्यवस्थेवर भाष्य केले. 


चांगले जीवन जगण्यासाठी शिक्षण आणि शिक्षक आवश्यक असले तरी मुलांच्या आवडीचा शिक्षक बनणे कठीण आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. वाचनामुळे मन समृद्ध होत असल्याने विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृती जोपासावी. जीवन ज्ञानसंपन्न होण्यासाठी वाचनाची आवड आणि सवड जोपासली पाहिजे, असे प्रतिपादन भागवत यांनी केले. यावेळी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनचे बाळकृष्ण शिंपुगडे, राहुल पाटील, राजशेखर सनबर्गी, भाग्यश्री देशपांडे, अमोल देशपांडे, प्रतिभा शिंपुगडे, जगदीश चव्हाण, अनिता जनवाडकर, मोहन जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post