प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अनुचित घटना रोखण्यासाठी आणि आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी पोलीसांनी पायाला भिंगरी बांधून काम करावे. नाकाबंदी करून परराज्यातून येणार दारू साठा, गुटखा, गांजा यावर कारवाई करा, बेकायदेशीर रोकड वाहतून होत असलेल तर निवडणूक विभागाच्या मदतीने कारवाई करावी. अशा सुचना पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी मंगळवारी क्राईम आढावा बैठकीत जिल्ह्यातील सर्वच प्रभारी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
निवडणूक काळात सराईत गुन्हेगार डोकं वर काढत असतात. मतदारांवर दबाव टाकतात, प्रसंगी साम,दाम,दंड,भेद या सर्वांचा वापर केला जातो. सर्वसामान्य मतदारांना कात्रीत पकडले जाते. हे सर्व प्रकार टाळण्यासाठी आणि निवडणूक व्यवस्थित पार पाडण्याची जबाबदारी पोलीस व जिल्हा प्रशासनाची असते. यासाठी सराईत गुन्हेगारांची यादी तयार करून त्यांच्यावर हद्दपार,स्थानबध्द,कारवाई करून त्यांच्या कडुन चांगल्या वर्तुणीकीचे हमीपत्र लिहून घ्यावेत.
त्याच प्रमाणे ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात वादावादीचे प्रसंग घडत असतात, यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी प्रत्येक गावातील पोलीस पाटील, पोलीस मित्र यांना सतर्क करावे. गावात किरकोळ घटना घडली तरी तात्काळ त्या ठिकाणी पोहोचून पुढे परिस्थिती बिघडणार नाही याची काळजी घ्यावी.
शहरासह ग्रामीण भागात नाकाबंदी करून प्रत्येक संशयास्पद वाहनांची इन कॅमेरा तपासणी केली जावी. त्याच प्रमाणे रुट मार्च, बूथ भेटी देऊन पहाणी करावी,अशा सुचना पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, निकेश खाटमोडे -पाटील, शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिके, करवीरचे उपअधीक्षक सुजितकुमार क्षीरसागर,एलसीबीचे निरीक्षक रविंद्र कळमकर, जिल्हा विशेष शाखेचे निरीक्षक तानाजी सावंत यांच्यासह पोलिस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी उत्कृष्ट कामगिरी केलेल्या स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकासह इतर पोलिसांचा या वेळी प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.