..तर विधानसभा निवडणुकीनंतर नोकरी, शिक्षणातील आरक्षण संपेल," ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

अकोला : ---राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत आरक्षण कळीचा मुद्दा ठरणार आहे. निवडणुकीनंतर नोकरी व शिक्षणातील आरक्षण संपवण्याचा घाट घातला जात आहे, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज येथे केला. आरक्षणामुळे सरकारी नोकर झालेल्या व आता शहाणपण शिकवणाऱ्या बिनडोक लोकांपासून सावध रहा, असे आवाहनही त्यांनी केले.

अकोल्यातील क्रिकेट क्लब मैदानावर आयोजित धम्म मेळाव्यात ते बोलत होते. पी. जी. वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित मेळाव्याच्या व्यासपीठावर बौद्ध महासभा, वंचित आघाडीचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी विरोधकांवर चौफेर टीकास्त्र सोडले. 

ॲड. प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले, आपल्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत. बऱ्याच जणांना शिंग फुटायला लागली आहेत. पाकीटमारीतून ती आली. लोकसभेमध्ये संविधान वाचवायच्या नावावर गावोगावी फिरत होते. 

  संविधान नव्हे तर काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचे नेते आपले पक्ष वाचवण्यासाठी फिरले. लोकसभा निवडणुकीनंतर संविधानावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातून हल्ला झाला. भाजपचे आरक्षण विरोधी धोरण आहेच. आरक्षणाच्या व्याप्तीकडे आपण बघत नाही.

मविआला मतदान करण्याचे काही आंबेडकरी विचारवंत, अधिकारी सांगत होते. मात्र, ते अधिकारी विद्वान नाही. मविआला पाठिंबा देणे म्हणजे पुढच्या पिढीचे पाय आपणच कापून टाकण्यासारखे आहे. जो समूह आपल्या कुटुंबाशी इमानदार राहू शकत नाही, तो चळवळीशी काय राहणार? अशा शब्दात जातीतील विरोधकांना ॲड. आंबेडकरांनी खडे बोल सुनावले. 

आरक्षण हा केवळ नोकरी, शिष्यवृत्तीचा प्रश्न नाही, तर गाभा आहे. शरीरातून हृदय काढले तर जगू शकणार आहे का? त्याच प्रमाणे व्यवस्थेत आरक्षण आहे. आरक्षण हे फक्त एससी, एसटीचे नव्हे तर ओबीसीचे देखील काढले जाण्याचे प्रयत्न केले जात आहेत. आरक्षणाविना घटना कुचकामी ठरेल. 

  विधानसभा निवडणुकीत आरक्षण कळीचा मुद्दा आहे. संपूर्ण निवडणूक आरक्षणाच्या भोवती फिरणार आहे. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होतील. त्यामध्ये ओबीसी आरक्षण नाही. सर्वोच्च न्यायालयाने ते काढले. विधानसभेनंतर शिक्षण व नोकरीतील आरक्षण सुद्धा काढले जाईल, असे ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.

ओबीसींचे आवाज दाबण्याच प्रयत्न

शरद पवार आम्ही २०० जागा निवडून आणू असे सांगतात.

  पण लोकसभेत एकही ओबीसी खासदार निवडून आला नाही. विधानसभेतील ओबीसींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होणार आहे. त्यामुळे ओबीसींनी सावध राहिले पाहिजे. विधानसभेत किमान १०० ओबीसी आमदार राहिले पाहिजे. तरच विरोध करता येईल. आरक्षणाला धोका आहे. विधानसभा निवडणुकीनंतर जनगणनेचा ठराव घेतला जाईल.

  त्याचा अहवाल येईपर्यंत नोकरी, शिक्षणातील आरक्षण थांबवले जाईल, असे ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले. धम्म मेळाव्याला मोठा जनसमुदाय उपस्थित होता.


Post a Comment

Previous Post Next Post