पोलिसांकडूनच तरुणीचा विनयभंग, अपहरणाचा प्रयत्न; नागरिकांनी पोलिसांना चोपले, वसईतील दोन पोलीस निलंबित

 

 प्रेस मीडिया लाईव्ह : 

 विशेष प्रतिनिधी  : सुनील पाटील

वसई : गोव्याला सहलीसाठी निघालेल्या पोलिसांनी वाटेत एकट्या जाणाऱ्या तरुणीला अडवून तिची छेड काढली आणि तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मंगळवार २४ सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील जामसंडे येथे ही घटना घडली होती. संतप्त गावकर्‍यांनी २ पोलिसांसह ५ जणांना बेदम चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. देवगड पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली आहे. हा प्रकार समजताच पोलीस आयुक्तांनी या पोलिसांनी दोन्ही पोलिसांनी निलंबित केले आहे.

वसई वाहतूक पोलीस शाखेत कार्यरत असणारे पोलीस शिपाई हरिराम मारोती गिते (३४) आणि पोलीस शिपाई प्रवीण रानडे (३२) हे आपले मित्र माधव केंद्रे, (३२) श्याम गिते शंकर गिते (३२) आणि सतवा केंद्रे (३२) यांच्यासह रजा घेऊन गोव्याला खाजगी वाहनाने सहलीसाठी जात होते. मंगळवार २४ सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील जामसंडे गावातील आनंदवाडी वळणावर एक १८ वर्षीय महाविद्यालयीन तरुणी घरी जात होती. ती एकटी असल्याचे पाहून या पोलिसांनी तिची छेड काढली. पोलीस शिपाई हरिराम गीते याने 'माझ्या सोबत येते का? तुला वसई फिरवतो असे सांगितले. वाहनातील अन्य पोलिसांनीही या तरुणीची टिंगलटवाळी काढून तिची छेड काढली. ती दुर्लक्ष करून जात असताना या पोलिसांनी तिचा हात ओढून तिला गाडीत टाकून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार समजताच आसपासचे ग्रामस्थ गोळा झाले. त्यांनी या पोलिसांना बेदम चोप दिला आणि देवगड पोलिसांच्या ताब्यात दिले. देवगड पोलिासंनी त्यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४ ७५(२) १४०(१) ६२,१४० (३) व ६२, १४० (४) ६२ ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे २५ सप्टेंबर रोजी देवगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

पोलीस शिपाई गीते, रानडे निलंबित

ही बाब वसईत समजताच खळबळ उडाली आहे. ज्या पोलिसांचे काम रक्षण करण्याचे आहे तेच महिलांची छेड काढून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करत असल्याने संतापाची लाट उसळली आहे. शुक्रवारी मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे पोलीस उपायु्क्त (मुख्यालय) सुहास बावचे यांनी विनयभंग करणारे पोलीस शिपाई हरिराम गिते आणि प्रवीण रानडे या दोघांना सेवेतून निलंबित केले आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनिमय १९५१ च्या कलन २५ अन्वये प्राप्त अधिकारानुसार व मुंबई पोलीस (शिक्षा व अपील) नियम १९५६ मधील नियम ३ च्या पोटनियम १ च्या खंड (अ-२) (१-अ)(एक) (दोन) अन्वये निलंबित करण्याच आल्याचे या पत्रकात म्हटले आहे.

किती आरोपींनी अटक?

१) हरिराम गिते (३५) २) प्रवीण रानडे (३४) ३) माधव केंद्रे ४) श्याम गिते (३५) ५) शंकर गिते (३२) ६) सतवा केंद्रे (३२) या ५ जणांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींपैकी दोन वसई वाहतूक शाखेतील पोलीस आहेत तर एक जण केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएसएफ) आणि एक जण राज्य राखीव पोलीस दलातील (एसआरपीएफ) दलात कार्यरत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post