पंचवीस शाळांच्या माध्यमातून मोबाईल लायब्ररी: अनोखा सामाजिक उपक्रम

 शिक्षक दिनाच्या निमित्ताने विशेष लेख -






 

प्रेस मीडिया लाईव्ह : 

 
 धरणगुत्ती येथील सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. सुनील दादा पाटील आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. संजीवनी सुनील पाटील या शिक्षक दांपत्याने आपला मुलगा चिरंजीव प्रिन्स सुनील पाटील याच्या सहयोगाने मागील अनेक वर्षांपासून आपल्या परिसरात जास्तीत जास्त मुलांनी वाचलं पाहिजे या उदात्त हेतूने एक सामाजिक दायित्व या भावनेने निरपेक्षपणे कार्य करीत आहेत. लेखकाची संवेदनशीलता समाजाचे प्रश्न मांडते आणि ते सोडवण्यासाठीसुद्धा पुढाकार घेते हे पाटील परिवाराने आपल्या प्रत्यक्ष कृतीमधून दाखवून दिले आहे.
        
  ग्रामीण भागातील, खाजगी शाळा, जिल्हा परिषद आणि नगर परिषदांच्या सुमारे पंचवीस पेक्षा अधिक शाळांना मोठ्या प्रमाणात ग्रंथ देणगी स्वरुपात देऊन त्या - त्या शाळांच्या माध्यमातून लहान - लहान ग्रंथालयांची निर्मिती केली आहे. प्रत्येक शनिवारी मुले या ग्रंथालयातील आपल्या आवडीची पुस्तके घरी घेऊन जातात. एकदा निवडलेले पुस्तक सदर विद्यार्थ्याकडे आठ दिवस राहते. या आठवड्याच्या कालावधीत सदर विद्यार्थ्याचे आई - वडील, आजी - आजोबा, बहीण - भाऊ, आणि मित्र - मैत्रिणी याच्या विना शुल्क लाभ घेत आहेत. आज मितीला त्यांच्या या संकल्पनेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्या वाचनाकडे वळले असून. नियमित पुस्तक वाचनाच्या सवयीमुळे विद्यार्थी मोबाईल आणि टेलीव्हिजन पासून दूर जात आहेत हा एक खूपच चांगला दृश्य स्वरुपातील बदल पहावयास मिळत आहे. एकंदरीत विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागल्यामुळे नियमित अभ्यास करणे आणि नियमितपणे शाळेला येण्याचे मुलांचे प्रमाण वाढले आहे  
         
 डॉ. सुनील दादा पाटील आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. संजीवनी सुनील पाटील या शिक्षक दांपत्याचा मुलगा चिरंजीव प्रिन्स सुनील पाटील हा संपूर्ण परिवाराचे ग्रंथप्रेम सर्वश्रुत आहेतच शिवाय ते सर्वजण उत्तम वाचक आहेत. पन्नास हजार पेक्षा अधिक विविध विषयांवरील आणि विविध भाषेतील पुस्तकांचा त्यांचा स्वत:चा मोठा ग्रंथसंग्रह आहे. आपल्या स्व: मालकीच्या ग्रंथसंग्रहातील आणि समजतील अन्य दानशूर व्यक्तींनी त्यांना देणगी स्वरुपात दिलेल्या पुस्तकांच्या माध्यमातून ते शाळा - शाळांना मोठ्या प्रमाणात ग्रंथदान करत आहेत.     
        
  डॉ. सुनील दादा पाटील हे एक उत्तम लेखक असून खंगत अभावग्रस्त जगणारा गावगाड्यातला अखेरचा माणूस त्यांच्या साहित्याचा विषय राहिला आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण नगर परिषद आणि जिल्हा परिषदेच्या शाळेत झाल्याने गाव गाड्यातला सूक्ष्म भवताल त्यांच्या बालमनावर उमटलेला दिसतो. सर्वसाधारण खेड्यातल्या पोरासारखंच त्यांचंही कुरतडून टाकणारं बालपण त्यांच्या कवितेतून वेळोवेळी प्रवर्तित आलेलं दिसतं. असंख्य खेड्यातून आलेल्या नवोदित लेखकांच्या हाताला लिहितं करणाराबळ देणारा एक तरुण आणि कल्पक प्रकाशक म्हणूनसुद्धा ते साहित्य क्षेत्रात परिचित आहेत. हल्ली काही प्रस्थापित साहित्यिक आपल्याच कोशात जगताना दिसून येतात. मात्र अशा काळात त्यांना भेटलेली, भावलेली वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसे कवितेच्या मध्यवर्ती ठिकाणी आणली आहेत.  डॉ. सुनील दादा पाटील यांनी आपल्या अनोख्या वचन आणि साहित्य चळवळीच्या माध्यमातून महाराष्ट्रभर साहित्य गणगोत जोडण्याचे काम केले आहे. शंभरापेक्षा जास्त दर्जेदार पुरस्काराचे ते मानकरी ठरलेले आहेत. अनेक सभा आणि संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. असे असतानाही साहित्यावरची निष्ठा तसूवरही कमी होऊ दिली नाही हे विशेष.
         
 गावचा अंधार दूर करायला प्रत्येक बालकाच्या हातात पाटी आणि पुस्तकं यायला हवी असं ते फक्त सांगून थांबले नाहीत तर आपल्या परीने प्रयत्न करत आहेत. त्यांनी अनेक लेखक घडवले. आपली वाचन संस्कृती समृद्ध करण्यासाठी सातत्याने विविध पातळ्यांवर प्रयत्नशील असतात. आपल्या देशातील विविध प्रादेशिक भाषांमधून त्यांनी साहित्य निर्मिती केली.  २०१० पासून आजतागायतकवितासागर सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून ते आपल्या पत्नीच्या मदतीने विविध शाळांच्या माध्यमातून मुलांचे मोफत ग्रंथालय चालवत आहोत. आजकाल वाचन संस्कृती लोप पावत चालल्याचे सर्वत्र सांगितले जात असले, तरी कोल्हापूर जिल्ह्यातील धरणगुत्ती येथील पाटील दांपत्याने या समजाला छेद दिला आहे. विद्यार्थ्यांनी आपला अमूल्य वेळ मोबाईल अथवा टीव्ही पाहण्यात वाया घालवू नये. त्याऐवजी त्यांनी उत्तमोत्तम पुस्तके वाचावीत म्हणून ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाच्या जोडीला अवांतर वाचनाची मोफत संधी देण्यासाठी पाटील दांपत्य अत्यंत प्रयत्नशील आहेत. आधुनिक जीवन पद्धतीत सात्विक जीवनासाठी वाचनाचे महत्त्व खूप मोठे आहे. वाचनाच्या छंदाचे जतन आणि संवर्धन करणे ही काळाची गरज असून, या पुढील काळात वाचनाचे महत्त्व सर्वांना समजून देण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी त्यांनी प्रत्येक शनिवार हा वाचन चळवळ आणि शालेय मुलांच्यावर सुसंस्कार व्हावेत यासाठी राखून ठेवला आहे; अशा पद्धतीने वर्षभरातील बावन्न दिवस डॉ. सुनील दादा पाटील आणि त्यांची सुविद्य पत्नी सौ. संजीवनी सुनील पाटील विनावेतन आपली निस्वार्थ सेवा विविध शाळांना देत आहेत.

         

 प्रत्येक शनिवारी (काही कारणास्तव शनिवारी शाळांना सुट्टी असल्यास सोमवार किंवा त्यापुढील दिवस) ते विविध शाळांना भेटी देऊन तेथील मुलांना कथा, कविता, कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र, सुविचार संग्रह, व्याकरण, भाषणांचा संग्रह, अनुवादीत साहित्य, विविध विषयावरील नियतकालिके, दिवाळी अंक आणि आरोग्य विषयक इत्यादि पुस्तकांचे वाटप करणे, वाचलेली पुस्तके परत घेऊन नवीन पुस्तके अदा करणे, पुस्तके वाचून मुलांनी लिहीलेल्या प्रतिक्रियांवर मुलांसोबत चर्चा करणे, निवडक प्रतिक्रिया पोस्टकार्डवर लिहून संबंधित लेखक / कवी यांना पाठविणे. तसेच मुलांना संस्काराच्या आणि सुविचारांच्या गोष्टी सांगून एक संस्कारक्षम आणि वैचारिक दृष्ट्या सक्षम पिढी घडवण्यासाठी कार्यरत आहेत. त्यांच्या नाविन्यपूर्ण ग्रंथालय चळवळीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांना वाचनाची आणि लिहिण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्यांचे कार्य नक्कीच कौतुकास्पद आहे.  

 

 

 

~ कवितासागर फिचर्स, जयसिंगपूर

पोस्ट बॉक्स ६९, नांदणी नाक्याजवळ, बायपास रोड,

जयसिंगपूर - 416101, तालुका - शिरोळ, जिल्हा - कोल्हापूर, महाराष्ट्र  

9975873569, 8484986064, 02322 225500, sunildadapatil@gmail.com


Post a Comment

Previous Post Next Post