पाण्यात विद्युत प्रवाह उतरला कोंढवा येथे एका महिलेचा विजेचा शॉक लागून मृत्यू


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : पुण्यात रविवारी झालेल्या मुसळधार पाऊस  मुळे  मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते  त्यामुळे पाण्यात विद्युत प्रवाह उतरला होता या मुळे एका महिलेचा विजेचा  शॉक लागून मृत्यू झाला आहे.  , तर आज देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या पावसाने एका महिलेचा बळी घेतला आहे. कोंढवा येथे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे वी ४० आहे. या महिलेचे नाव समजू शकले नाही.

पुण्यात रविवारी संध्याकाळी जोरदार पाऊस झाला. तब्बल तीन ते चार तास हा पाऊस सुरू होता. वडगाव शेरी, कोंढवा, हडपसर, सुस, पाषाण, शिवाजी नगर परिसरात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे जागोजागी पाणी साठले होते. कोंढवा येथे राहणाऱ्या महिलेच्या घराबाहेर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. येथे जवळच विद्युत रोहीत्र असून येथील एक तार ही पाण्यात पडली होती. त्यामुळे पाण्यात विद्युत प्रवाह उतरला होता. पाऊस कमी झाल्यानंतर ही महिला बाहेर पडली. डीपीमधून विद्युत तारा बाहेर आल्या होत्या. या तारा रस्त्यावर साठलेल्या पाण्यात पडल्याने संपूर्ण परिसरात विद्यूत प्रवाह पसरला होता. या बद्दल महिला अनभिज्ञ होती. तिने पाण्यात पाय ठेवताच या तारांचा स्पर्श महिलेला झाला. यामुळे तीव्र शॉक बसल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांना देखील दोष दिला जात आहे. नादुरुस्त डीपीच्या तारा खराब होऊन बाहेर आल्या असतांना त्या दुरुस्त का करण्यात आल्या नाहीत असा सवाल स्थानिकांनी केला आहे. पुण्यात यापूर्वी देखील याच भागात विजेच्या शॉक लागून एका मुलाचा मृत्यू झाला होता. या वाढत्या घटनांमुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच नादुरुस्त रोहीत्र दुरुस्त करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post