तीर्थ विठ्ठल – शेर विठ्ठल

 नमस्कार ,आषाढीच्या मनःपूर्वक शुभेच्छा…


या निमित्ताने गेल्या एकोणचाळीस वर्षाच्या गझललेखन प्रवासातील शेकडो गझलांतील या विषयाशी निगडीत अनेक शेरांपैकी सत्तरावर  शेर…

प्रसाद माधव कुलकर्णी (९८ ५०८ ३० २९०)

५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेट,

समाजवादी प्रबोधिनी , इचलकरंजीता.हातकणंगलेे जि .कोल्हापूरपिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र)

prasad.kulkarni65@gmail.com


जरी माणसे चालली पंढरीला

विठू माणसांच्याच वारीत आहे..

———-

वारा पेक्षा वारीने समतेचा जागर होतो

मी प्रबोधनाची दिंडी त्यासाठी काढत होतो..

———-

गझल म्हणजे चारधामी तीर्थक्षेत्रे

अन तिच्या वारीतला मी शब्दयात्री..

———-

वीट ती मिळेल काय विठ्ठला उभारण्यास ?

बघ अधांतरी समाज राहिला युगेयूगेच….

———-

सर्व पापांना धुतांना बोललेली चंद्रभागा

मिळविण्याला मोक्ष येथे ‘माणसांशी नीट वागा..’..


विठ्ठलाला कर्मकांडे मान्य ही नव्हतीच केंव्हा

भावभक्तीनेच त्याच्या अंतरी सर्वास जागा..

———-

पुरे पुष्पकाची अनाहूत चर्चा

अभंगात त्याच्या बघावा तुकोबा..


सुरू पोपटांची भजन – किर्तनेही

तुकोबा कडोनी शिकावा तुकोबा..

———-

तो संतांचा संस्कार कुठे ?हा श्रद्धेचा व्यापार कुठे ?…

निरुपणाची लाख बिदागी ज्ञानोबाला घरदार कुठे ?…..

———-

होऊ सारे विवेकवादी

कारण विठ्ठल मानववादी..


मोक्ष कल्पना गुंडाळावी

कारण विठ्ठल जीवनवादी..


गरिबांचा तो विचार करतो

कारण विठ्ठल समाजवादी..

———-

संतांवर बोलत बोलत तो संतच समजत आहे

ते अमृत अनुभव आता नागोबा सांगत आहे...


विठ्ठलही विटला आहे या इथल्या भोंदुगिरीला

या आसारामी मठास तो सुरुंग लावत आहे…

———-

जळी, स्थळी अन काष्ठी वसतो निसर्गामध्ये विठ्ठल रमतो..

पंढरपूर हा त्याचा पत्ता पण ,भक्तांच्या हृदयी असतो..

———-

ऊब गझलेत जाणवते तरी

ओवी – अभंग पांघरून बघू…

———-

सुखाच्या कीर्तनाला

झडोनी द्वेष यावे….

—-–——–

आरतीस गर्दी मोठी रोज भाविकांची

देवळात दिसला नाही विठू राहताना…

———-

लेकरांच्यात हा भेद का ?

भक्त देवांवरी कोपला…

———-

नाही शिवारात पाणीच विठोबा

वारीतले पाय भेंडाळले आज…

———-

इमारती सुन्यासुन्या

विठू दिसे विटेवरी..

———-

चरचराच्या साठी लिहून गेला ओव्या

सखा खरा विश्वाचा पसायदानी ज्ञाना…

———-

प्रेमरसाळी अभंग म्हणतो हे गझलेला

तुझ्या एकदा मुशायऱ्याला यावे म्हणतो…

———-

अजान वृक्षाखाली ज्ञाना हेच म्हणाला

पानोपानी गझल दिसावी नवीन वर्षी...


अभंग,ओवी, दोहा गवळण ,श्लोक म्हणाले

आपण सुद्धा गझल लिहावी नवीन वर्षी….

———-

त्यांच्या खऱ्या जगण्यामध्ये संतत्व शोधाया नको

ज्ञानाविना,तुकयाविना ज्यांची सुरू पारायणे…

———-

युगेयुगे हा उभाच विठ्ठल

निवांत होते मठात सारे…

———-

असते शपथ ज्ञात ही पायरीला

नाहीच शिखरास गाठावयाचे…

———-

जागर केला ज्ञानोबाने

शेर लिहावे संत तुक्याने…

———-

मी चारधाम यात्रा केली कधीच नाही

माणूस शोधतांना सरला प्रवास माझा..

———-

मी आज ज्ञानराया तुझियाच प्रेरणेने

ह्या पालखीत गझला घालून नेत आहे..

———-

माणूस वेगळा हा या प्रार्थनेत आहे

कोठे असेल पूजा,कोठे नमाज आहे..

———-

एवढेच पुण्यकर्म लागलो करावयास

माणसास माणसात आणतोय आजकाल…

———-

सांगतो ज्ञानराया ही कहाणी युगांची

स्वागताला युगांच्या थांबले शब्द माझे..

———-

जिथे गीत माझे असे गाडलेले

तिथे बांधली मी स्वतःची समाधी…

———-

ठेवती गीतेवरी या हात सारे 

पण खऱ्याने बोलण्याचा प्रश्न आहे..

———-

अद्वैत भावनेला सांगून संत गेले

श्वासात आज माझ्या तू एकरूप व्हावे..

———-

सूर तेथे बासरीचे ऐकतो मी 

कृष्ण जेथे सोडतो रानात गाई..


धर्म येथे स्थापला मी माणसांचा

दूर गेले, सर्व माझे जातभाई…

———-

नाही तुक्या तुझीही गाथा तरुन गेली

गेली बुडून पाने, आल्या तरुन अफवा..

———-

माणसांची खरी जात आहे कुठे ?

धर्म जाती मुळे विखरती माणसे...


दोष देऊ नये माणसांना उगा

शेवटी देह हा उचलती माणसे..

———-

येऊ कसा विठू मी गर्दीत दर्शनाला ?

नावे तुझ्या दलाली दिसतेच नेहमीची..

———-

रोजचा व्यापार माझा हा तुक्याच्या सारखा

कोहळा देऊन हाती राहिलेला आवळा…

———-

भक्तांची हळहळ झाली तोतया निघाल्यानंतर

पण,प्रसाद सांगत होता मी अंध पुजारी नाही..

———-

विठ्याची वैरणीसाठी असे शेती

कुठे पण दूध त्याच्या लेकरा आहे ?

———-

तो पावत होता नवसाला

जो हाल स्वतः सोसत आहे..

———-

भट्टीत भाजलेली रखमा मला म्हणाली

माझा विठू बिचारा आहे इथे विटेवर..

———-

वाट तशी ही किचकट आहेआयुष्याची फरफट आहे..

वाट चालूनी पाय म्हणाले प्रवास पुढचा धुरकट आहे…

———-

जाहलो गझलचाच भक्त मी

वाटतो प्रसाद हा घरोघरी..

———-

तुला ही प्रार्थना माझी फुलू दे वेदना माझी..

गझलने मांडली आहे विठुची कल्पना माझी..

———-

मानवतेला उरात ठेवा

संत वेगळा असतच नाही…

———-

थोडा प्रकाश पसरो अंधारल्या ठिकाणी

कामात येत राहो माझे लिखाण -वाणी..


मूर्तीस दान त्याने सोने – हिरे दिलेले

थाळीत फेकतो तो कुच्छित होत नाणी…

———-

हृदये जोडत प्रेम घराशी होऊ शकते

माझे घरही मदिना – काशी होऊ शकते..


जमिनीवरती पडता पडता थेंब म्हणाला

माझी मैत्री पुन्हा नभाशी होऊ शकते…

———-

सर्वस्वाचे दान द्यायचे म्हणून जातो गाणी वाटत..

तुझ्या कृपेची पोच पावती जीर्ण न होते..नाही फाटत…

———-

मी प्रसादाची भुकेली प्रार्थना हे बोललेली..

भंगलेली भिंत माझीया विटेने जोडलेली…

———-

भक्ता तुझे जिणेही केले महाग यांनी

भरते न पोट केंव्हा ठेऊन अंधभक्ती...


सत्तेस कैक साधू- योगी हपापलेले

कपड्यांशिवाय त्यांची दिसते कुठे विरक्ती ?….

------+-----


मूर्ती झाल्यानंतर त्याचा त्रास रोजचा वाढत गेला 

देव म्हणाला दगडाला की तुझ्यासारखे बनव मला...

---------

सर्व पापांना धुताना बोललेली चंद्रभागा 

मोक्ष आहे पाहिजे तर माणसांशी नीट वागा..


विठ्ठलाला कर्मकांडे मान्य ही नव्हतीच केव्हा 

भावभक्तीनेच त्याच्या अंतरी सर्वात जागा...

------


ज्यांची असते डोळस भक्ती त्यांना भेटे स्वतःच विठ्ठल 

 रखुमाईशी बोलत होता नव्या आंधळ्या भक्तांबद्दल....


वारी,दिंडी , परंपराने मानवतेचे आहे मुद्दल 

जातभेद जो मानत नाही वारकरी तो ठरतो अस्सल...


किर्तन समई नाचत खेळत वारकऱ्यांशी विठू बोलतो 

अभंग, ओवी श्लोका सोबत असे गझलही याची अव्वल...

---------_


ओवीची ही इच्छा आहे 

पुढील जन्मी गझल व्हायचे...

------


कित्येक युगांच्या नंतर कानांना पाय म्हणाले 

राहिला उभा विठ्ठल हे कळलेच विटेला नाही...

-------

(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार म्हणून सुपरिचित आहेत .

Post a Comment

Previous Post Next Post