प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी ता.१५, कालवश सुरेश भट यांच्या कवितेतून अतिशय तरल आणि तलम भावनेचा आविष्कार दिसून येतो.संगीताची जाण आणि कान असणाऱ्या सुरेश भट यांचा सर्व तत्त्वज्ञानांचाही सखोल अभ्यास होता. त्यामुळे त्यांच्या कवितेतून निखळ मानवता, वैश्विकता दिसून येते.
अतिशय हळुवार प्रेमभावने बरोबरच चुकीच्या गोष्टीवर प्रहार करतांना त्यांच्या शब्दांतून जो कठोर टणत्कार व्हायचा ते मराठी कवितेचे नजाकतधारी व प्रहारी वैशिष्ट्य होते.मेंदीच्या पानावर, आज गोकुळात रंग ,मलमली तारुण्य माझे, गे माय भू तुझे मी ,आता जगायाचे असे ,तरुण आहे रात्र अजुनी यासारखी शेकडो अजरामर गाणी ,कविता ,भावगीते , पोवाडे त्यांनी लिहिले .पण त्यांची खरी ओळख आहे ती म्हणजे मराठी गझल विद्यापीठाचे संस्थापक कुलपती हीच आहे. 'जरी या वर्तमानाला कळेना आमची भाषा ,विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही 'असे म्हणणाऱ्या सुरेश भटाने मराठी गझलेमध्ये काही पिढ्या घडवल्या. हे त्यांचे अखिल भारतीय साहित्य सृष्टीतील फार मोठे वैशिष्ट्य आहे असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस व गझलकार प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ते कालवश सुरेश भट यांच्या ९१ व्या जन्मदिनी समाजवादी प्रबोधिनी व प्रबोधन वाचनालयाच्या वतीने त्यांना अभिवादन करताना बोलत होते. प्रारंभी महमद मुल्ला यांच्या हस्ते सुरेश भट यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
प्रसाद कुलकर्णी म्हणाले,एखाद्या प्रतिभावंत आणि रसिकमान्य कवीने एखाद्या काव्य प्रकाराबाबत संपूर्ण आयुष्य वाहून घेणे आणि त्यात नव्या पिढ्या निर्माण करण्याचे जिवनध्येयी काम करणे हे फार दुर्मिळ असते.सुरेश भट यांनी ते अखंडपणे केले.माझा संबंध जगण्याशी आणि माणसांशी होता .माणूस आणि मानवी संबंध हीच माझी प्रेरणा आहे. जीवन तसे अपूर्णच असते. संपूर्णते साठी जखमा अपरिहार्य असतात. ज्या जीवनात जखमा नाहीत ते जीवनही समृद्ध नाही .कवितेचा संबंध आयुष्याची असतोच असे ते म्हणत. त्यामुळे त्यांच्या कविता प्रत्येकाला आपल्या वाटतात. यावेळी पांडुरंग पिसे, महालिंग कोळेकर, सौदामिनी कुलकर्णी,नंदा हालभावी,सुरेश पवार, संदेश जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.