.फक्त काही बंधने पाळून या विषाणू पासून

 राज्य कायमचे मुक्त करायचे आहे....मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 



प्रेस मीडिया ऑनलाइन :


मुंबई :  रोजी रोटी बंद करायची नाही, जीवन थांबू द्यायचे नाही.फक्त काही बंधने पाळून या विषाणू पासून राज्य कायमचे मुक्त करायचे आहे, असा निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केला.

राज्यात नवीन निर्बंध लागू केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला कळकळीचे आवाहन केले आहे. त्या मध्ये मुख्यमंत्री म्हणतात की, कोरोनाच्या विषाणूशी लढताना आपल्याला दोन वर्षे झाली आहेत. या काळात आपण संसर्गाच्या मोठय़ा दोन लाटा अनुभवल्या आणि काळजीपूर्वक पावले उचलत त्या रोखल्यासुद्धा. मात्र आता रूप बदलून आलेला विषाणू किती धोकादायक आहे किंवा नाही यावर चर्चा न करता या संसर्गाला लवकरात लवकर थोपवणे गरजेचे आहे, अन्यथा आपल्या आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण येऊ शकतो. याच मुळे वारंवार टास्क फोर्स, केंद्रीय आरोग्य विभाग तसेच वैद्यकीय क्षेत्रातील सर्व संबंधितांशी विचारविनिमय करून आपण राज्यात काही निर्बंध लावण्याचे ठरविले आहे. मी स्पष्ट करतो की, आपल्याला कुठलाही लॉकडाऊन करून सगळं ठप्प करायचे नाही. केवळ कायदे आणि नियम करून अशा आव्हानांचा मुकाबला होऊ शकणार नाही, तर प्रत्येक नागरिकाने मग तो समाजातला कुणीही घटक असो प्रत्येकाने आता ही लढाई अंतिम आहे आणि हा शेवटचा घाव कोरोनावर करायचाच अशा निश्चयाने आरोग्याचे नियम पाळायचे आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे.

 तर ऑक्सिजनची मागणी वाढेल

आज आरोग्य यंत्रणेवर ताण यायला सुरुवात झाली आहे हे नाकारता येत नाही. रुग्णसंख्या याच वेगाने वाढली तर सहव्याधी असलेल्या किंवा अद्याप लस न घेतलेल्या रुग्णांना मोठय़ा प्रमाणावर रुग्णालयात दाखल करावे लागून ऑक्सिजनची मागणीदेखील वाढू शकते. आज अनेक ठिकाणी आपले डॉक्टर्स, परिचारिका, वैद्यकीय क्षेत्रातील फ्रंटलाइनर्स हे विषाणूच्या संसर्गामुळे आजारी पडलेले दिसत आहेत. हा आपल्यासाठी इशारा आहे. आपल्याकडे साधनसामुग्री पुरेशी आहे. दोन वर्षांत आपण सुविधांमध्ये वाढ केली आहे, पण डॉक्टर्स आजारी पडले तर नवे मनुष्यबळ कुठून आणणार? हे आव्हान आपल्याकडेच आहे असे नाही तर देशात इतरत्र आणि काही देशांतदेखील यामुळे समस्या निर्माण झाली आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे माझे अतिशय कळकळीचे आवाहन आहे की, नियम पाळा, सरकारने घालून दिलेल्या निर्बंधांना तोडू नका. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणताही धोका न पत्करता थोडी जरी लक्षणे आढळली तर आपल्या डॉक्टर्सना दाखवा किंवा त्यांचा सल्ला घ्या, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

शिक्षण थांबणार नाही

आपण शाळा-महाविद्यालये परत ऑनलाइन केली आहेत. शिक्षण थांबणार नाही याची काळजी घेतली आहे. त्यामुळे आपल्याला मिळालेली ही सुट्टी आहे असे समजून इकडे-तिकडे अनावश्यक फिरून कोरोनाचे दूत बनू नका, असेही आवाहन मी माझ्या तरुण मित्रांना करतो.

कठोर निर्बंधांचा पर्याय

या सगळ्यामध्ये लसीकरण फार आवश्यक आहे. अजूनही लस घेतली नसल्यास लगेच घ्या. आज या विषाणूची तीव्रता आपल्याला जाणवत नसेल किंवा मृत्युदर कमी असेल तर तो केवळ लसीकरणामुळे आणि सतत मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे या सवयीमुळे आहे हे लक्षात ठेवा. काही जिह्यांत लसीकरण पुरेसे झालेले नाही तिथे रुग्णसंख्या अधिक वाढून रुग्णालयांमध्ये दाखल होण्याचे प्रमाणही वाढू शकते. त्यामुळे लसीकरण कमी असलेल्या जिह्यांच्या बाबतीत निर्बंध अधिक कठोर करण्याचा पर्यायदेखील सरकारकडे आहे, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी शेवटी दिला.

नियम पाळलेच पाहिजे

मी गेल्या दोन वर्षांपासून पाहतोय, राज्य सरकारने 'ब्रेक दि चेन' आणि 'मिशन बिगीन अगेन'च्या माध्यमातून वेळोवेळी नियमावल्या केल्या आणि अमलात आणल्या. आरोग्याचे नियम पाळण्यात बहुतांश नागरिक उत्सुक होते आणि आहेत आणि ते पाळतातसुद्धा. पण काही मूठभर लोकांच्या नियम न पाळण्याच्या वृत्तीमुळे आणि बेजबाबदार वागण्यामुळे प्रश्न निर्माण होतो. हे यापुढे चालणार नाही. नियम पाळलेच पाहिजेत, अन्यथा संबंधितांवर कडक कार्यवाही करण्याचे निर्देश सर्व यंत्रणांना, आणि पोलिसांना दिले आहेत. हे सर्व आपल्या भल्यासाठीच आहे. लवकर या विषाणूच्या जोखडातून बाहेर काढण्यासाठी आहे हे लक्षात घ्या, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post