प्रेस मीडिया वृत्तसेवा :
कोल्हापूर - मराठा समाजाच्या आरक्षणासह अन्य मागण्यां बाबतच्या लढ्यासाठी महाराष्ट्राला दिशादायक ठरणाऱ्या मूक आंदोलनास आज, बुधवारी कोल्हापुरातून सुरुवात करण्यात आली आहे. हे आंदोलन खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वात करण्यात आले असून यामध्ये अनेक नेत्यांनी सहभाग घेतला आहे.
यावेळी श्रीमंत शाहू छत्रपती यांनी उपस्थितांना संबोधित करताना 'पंतप्रधान मोदी यांनी ठरवले तर नक्कीच मराठा आरक्षण मिळू शकतं' असे मत स्पष्ट केले आहे. श्रीमंत शाहू छत्रपती म्हणाले की, 'मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका अद्याप समोर आलेली नाही. ती आपल्याला समजायला हवी. त्यांच्यापर्यंत आपला मुद्दा पटवून द्यायला हवा.दिल्लीत भाजप आज बहुमतात आहे. पंतप्रधानपदी तिथं नरेंद्र मोदी बसलेत त्यांच्यापर्यंत आपला बुलंद आवाज पोहोचायला हवा. आपण बलाढ्या आहोत असं समजून दिल्लीत आवाज पोहोचला पाहिजे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊनच दिल्लीत पाठपुरावा करायला हवा. समिती वैगेरे सगळं नाममात्र असतात पंतप्रधानांनी जर ठरवलं तर ते सगळं करू शकतात'
'एकाच व्यक्तीने हे घडवून आणणे हे शक्य नाही. यासाठी मोठा लढा द्यावा लागणार आहे. राज्यातील 48 खासदारांनी दिल्लीत आवाज वाढवला पाहिजे. केंद्रात बहुमतात सरकार आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे हा विषय मांडावा लागणार आहे. आरक्षणासाठी घटना दुरूस्ती व्हावी. कायदेशीर लढाईपेक्षा घटना दुरूस्ती केली तर हा विषय लवकर सुटू शकतो' असेही छत्रपती शाहू म्हणाले आहेत.