ठाण्यातील ज्येष्ठ पत्रकार सोपान बोंगाणे यांचे पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात कोरोनाशी झुंज देताना निधन झाले. त्यांचे वय 67 वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. बोंगाणे यांच्या निधनाने आधुनिक ठाण्याच्या राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक जडणघडणीचा साक्षीदार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
मूळचे मराठवाडयातील असलेले बोंगाणे नोकरीसाठी मुंबईत आले. बँक ऑफ इंडियात नोकरी करत असताना त्यांनी ठाणे शहरातील स्थानिक वृत्तपत्रात अंशकालीन बातमीदार म्हणून सुरुवात केली. ठाणे जिह्यातील ग्रामीण भागातले विविध प्रश्न त्यांनी हाताळले. नागरी समस्या, राजकीय, सामाजिक प्रश्नांवर अभ्यासपूर्ण वृत्तांकनही त्यांनी केले.काही वर्षे त्यांनी दैनिक 'सामना'चे ठाणे प्रतिनिधी म्हणूनही काम पाहिले. विविध वृत्तवाहिन्यांवर राजकीय विश्लेषक म्हणून ते सहभागी होत असत. मराठवाडा जनविकास परिषद, ठाणे संस्थेचे ते महासचिव होते. पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि महापौर नरेश म्हस्के यांनी बोंगाणे यांना श्रद्धांजली अर्पण केली.
धाराशीव येथील ज्येष्ठ पत्रकार मोतिचंद बेदमुथा यांचे हैदराबाद येथील एका खासगी इस्पितळात उपचार सुरू असताना निधन झाले आहे. ते 69 वर्षांचे होते. 'महाराष्ट्र टाइम्स'चे जिल्हा प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केले होते. तसेच धाराशीव येथील दैनिक 'समय सारथी'चे ते संस्थापक संपादक होते. धाराशीव जिल्हा मराठी पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रांत प्रतिनिधी म्हणूनही ते सध्या कार्यरत होते. तसेच जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले होते.
दैनिक 'लोकसत्ता'चे श्रीरामपूर येथील वरिष्ठ पत्रकार अशोक दगडू तुपे (वय 57, रा. कान्हेगाव) यांचे आज दुपारी नगर येथे खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन भाऊ, दोन मुले असा परिवार आहे.
अशोक तुपे यांची आठ दिवसांपूर्वी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यांच्यावर नगरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यातून ते बरेही झाले होते. दोन दिवसांनंतर त्यांना डिस्चार्ज मिळणार होता. मात्र, आज सकाळी तुपे यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. अशोक तुपे यांनी 35 वर्षे पत्रकारितेत काम केले. महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कारासह त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.