कोल्हापूर - ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. अनेक प्रस्थापितांना या निवडणुकीत धक्के बसले आहे. यात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेकांचा समावेश आहे. चंद्रकांत पाटील यांच्या पॅनलच्या पराभवावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकासमंत्री मुश्रीफ यांनी खोचक टीका केली आहे.
गावात सत्ता नाही, जिल्ह्यात नाही आणि हे कसले प्रदेशाध्यक्ष, असे मी नव्हे तर भाजपाचाच एखादा कार्यकर्ता प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना म्हणू शकतो, अशी बोचरी टीका ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी येथे केली. ग्रामपंचायत निकालाच्या भुदरगड तालुक्यातील खानापूर ग्रामपंचायतीत आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पॅनलचा पराभव झाला. या पराभवाची निकाल लागल्यापासूनच जिल्ह्यात व माध्यमांवरही जोरदार चर्चा सुरू होती. जिल्हा परिषदेच्या सदस्यांशी बोलताना मुश्रीफ यांनी पाटील यांना टोला लगावला. यावेळी भाजपाचे सदस्य विजय भोजे यांच्याकडे पाहून मुश्रीफ म्हणाले, 'अहो, ते खानापूरच्या निकालाचीच जास्त चर्चा सुरू झाली आहे. कोणत्याही नेत्याच्या गावातल्या पराभवाची चर्चा जास्त होते. आता तुमच्यासारखा कार्यकर्ता असे म्हणू शकतो, की गावात सत्ता नाही, तालुक्यात सत्ता नाही, जिल्ह्यात नाही आणि प्रदेशाध्यक्षपद मात्र आहे.'